जळगाव : संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायला जाऊ दिले नाही म्हणून घरातच गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या एकुलत्या एक अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी विरहात अवघ्या दीड महिन्यातच बुधवारी आत्महत्या केली. मजुरी करणाऱ्या बापाने सकाळी आपल्या कामाच्या ठिकाणी गळफास घेतला आणि दोन मुलींची जबाबदारी पत्नीवर टाकून तो कायमचा निघून गेला.
रमेश सुकलाल राजपूत (५५) असे मृताचे नाव आहे. रमेश यांचा मुलगा यश याने संक्रांतीच्या दिवशी आत्महत्या केली होती. कुटुंबीयांनी काळजीपोटी त्याला १४ जानेवारीला पतंग उडवण्यासाठी घराबाहेर जाऊ दिले नव्हते. त्यामुळे चिडलेल्या या १३ वर्षीय यशने घरातच गळफास लावून घेतला होता. या घटनेने राजपूत कुटुंब मानसिकदृष्ट्या खचले होते. राजपूत तर तेव्हापासून खिन्न होते. आपल्या भविष्याचे काय होणार, असे ते नातलग, सहकारी यांच्याजवळ बोलून दाखवत होते. ज्या घरात छोट्या यशने जीवन संपवले ते घरही त्यांनी सोडून दुसरीकडे वास्तव्य केले होते.
कामाच्या ठिकाणीच जीवन संपवले
रमेश राजपूत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका व्यापाऱ्याकडे बारदान शिवण्याचे काम करीत होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे ३४ क्रमांकाच्या या दुकानात गेले. पिण्यासाठी पाणी भरून ठेवले. त्यांचे मजूर सहकारी दुकानाबाहेर काम करताना आपले डोके दुखत असल्याचे सांगून सकाळी साडेनऊ वाजेनंतर ते आत गेले आणि बारदानाची जाड पट्टी कापून तिचा फास त्यांनी गळ्याला लावून घेतला.














