जळगाव : दुकान घेण्यासाठी माहेराहून २५ लाख रुपये आणावे नाहीतर, अंगावर रॉकेल टाकून पेटवून मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राखी राजेश तलरेजा (वय ३८, रा. गणेश नगर) यांचा विवाह मलापुर (ता. बुलडाणा) येथील राजेश रामचंद तलरेजा यांच्याशी (वर्ष २०१२) मध्ये रितीरिवाजानुसार विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती राजेश तलरेजा याने दुकान घेण्यासाठी माहेरहून २५लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने विवाहितेला चटके देण्यास सुरवात केली.
पैसे आणले नाही तर अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळून टाकण्याची धमकी दिली. यासाठी पतीचे मोठे तीन भाऊ, पुतण्या आणि चुलत जेठ यांनी देखील मारहाण केली. यात विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या.
छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती राजेश रामचंद्र तलरेजा, जेठ अमर तलरेजा, विनोद तलरेजा, मुकेश तलरेजा, पुतण्या अजय मुकेश तलरेजा सर्व (रा. छोटी सिंधी कॉलनी वाटर सप्लाय, कंवर नगर, मलकापूर जि. बुलडाणा) आणि चुलत जेठ सुभाष तलरेजा (रा. बुलडाणा) यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.