महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष:वाळू वाहतूक वाहनांना डिझेल मिळते तरी कुठून?
भडगाव (प्रतिनिधी)- सर्वत्र लॉकडाऊन असतांना भडगाव शहरात मात्र अवैध वाळू वाहतूक करून वाळू माफिया आपली वाहने सुसाट पळवीत आहे तर याकडे महसूल विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे बोललं जात आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळणे कठीण असतांना दुसरीकडे वाळूमाफियांना डिझेल व पेट्रोल मोठया प्रमाणात उपलब्ध कोण करतेय याचा शोध घेणे आवश्यक आहे.
लॅाकडाऊन दरम्यान वाळू चोरीचे प्रमाण खूपच वाढलेले दिसत आहे . शहरासह सगळीकडे वाळू चोरी तुफान चालू आहे . महसूल प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे अशी चर्चा जनमाणसात आहे .सद्य स्थितीला भडगावात रात्रीच्या वेळी बरेच वाळूचे ट्रक्टर चालतात रात्री १० वाजेपासून सकाळी ६.३० वाजेपर्यंत जोरदारपणे अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक केली जाते .शहरात रोज रात्री 30 ते 40 ट्रक्टर वाळूचे चालतात. मग अशा वेळी वाळू चोरी रोखण्यासाठी नेमलेली पथके काय करतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो .
नदीपात्रात ट्रक्टर मध्ये वाळू भरताना वाळू भरणारे बरेच मजूर असतात ते एकत्रित रित्या ऐकमेकांच्या संपर्कात येतात. त्याचप्रमाणे ड्रायव्हर मंडळी देखील टूॅक्टर भरेपर्यंत एकत्रितरित्या गप्पा मारतात . यामुळ कोरोना लॉकडाऊन अभियान सफल होण्यात अडचणी येत आहे .एकत्रित येऊन गर्दी करू नये असे आदेश असताना विनाकारण कोरोना संक्रमणाचा धोका या वाळू वाहतूकदारांमुळे होवू शकतो . मात्र या गोष्टीकडे प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे . भडगावच्या तहसीलदार यांनी अवैध होणारी वाळू चोरी यावर निर्बंध आणावेत .
वास्तविक प्रशासनाने वाळूचोरी बाबतीत अतिशय ठोस भूमिका घेणे गरजेचे असताना प्रशासन पाहिजे तसे कडक अभियान राबविताना दिसत नाही .
राज्यभरात नव्हे सगळीकडे कोरोनाने उच्छाद मांडलेला आहे अशा वेळी लॉकडाऊन चा फायदा घेत वाळूमाफियांनी गिरणा नदीपात्रात अनाधिकृतपणे वाळू उपसा चालू ठेवून प्रशासनाला देखिल गंमत बघायला लावलेली आहे .
लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेच्या व्यक्तिनांच पेट्रोल डिझेल देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळणे असंभव असताना दुसरीकडे वाळूमाफियांना डिझेल व पेट्रोल कितीही प्रमाणात उपलब्ध होत आहे या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नाही का? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे प्रशासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे .















