
मुंबई | प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी परिसरात भावपूर्ण वातावरणात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. “उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमी येथे उपस्थित राहून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले. समाजाला समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या या महामानवाच्या कार्याची आठवण यावेळी करण्यात आली.
यानंतर मुंबई पोलिसांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. मोठ्या शिस्तीत आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री छगन भुजबळ, संजय शिरसाट, संजय राठोड तसेच इतर सहकारी मंत्री, प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभरातून आलेल्या अनुयायांनी चैत्यभूमीवर हजेरी लावत बाबासाहेबांना अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांचा जागर ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.














