नवी दिल्ली – देशातील युवकांना अराजक बिलकूल आवडत नसून अव्यवस्था आणि अस्थिरतेमुळे देशातील युवकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून होत असलेल्या हिंसक आंदोलनांच्या संदर्भात पंतप्रधानांच्या या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान मोदी आपला मासिक कार्यक्रम मन की बात मध्ये विचार मांडत होते.
ज्यांचा जन्म २१ व्या शतकात झाला आहे, असे युवक येणाऱ्या दशकाला गती देण्यात मोठी आणि महत्वाची भूमिका निभावतील असे मोदी म्हणाले. महत्त्वाची भूमिका घेणारे युवक हे मुद्दे समजून घेतच लहानाचे मोठे झाले आहेत. अशा सर्व युवकांना अनेक नावांनी ओळखले जाते. काही लोक त्यांना मिलेनियल म्हणतात, तर काही त्याना जेड किंवा जनरेशन जेड या नावाने ओळखतात. ही सोशल मीडिया पिढी आहे ही गोष्ट तर प्रत्येकाच्या डोक्यात चांगलीच ठसलेली आहे. आमची ही पिढी अतिशय प्रतिभावान आहे याचा अनुभव आम्हाला येतच आहे. काही तरी वेगळे करण्याचे या युवकांचे स्वप्न असते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवकांचे वर्णन केले.
पंतप्रधान मोदी आपल्या ‘मन की बात’मध्ये पुढे म्हणाले की, या पिढीचा स्वत:चा एक विचार आहे.सध्याच्या काळात देशातील युवक व्यवस्थेच्या बाजूने आहेत, ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा व्यवस्थेवर विश्वास आहे, मात्र जर व्यवस्थेने योग्य पद्धतीने त्यांना प्रतिसाद दिला नाही, तर ते अस्वस्थ होतात आणि मोठ्या हिमतीने ते व्यवस्थेला प्रश्न विचारतात. आणि हे अतिशय योग्य असल्याचे मी मानतो. मात्र, देशाचे युवक अराजकतेच्या बाजूने नाहीत हे निश्चित. अव्यवस्था आणि अस्थिरतेबाबत त्यांच्या मनात चीड आहे. ते घराणेशाही, जातीयवाद, आप-पर, स्त्री-पुरुष भेद अशा गोष्टींच्या विरोधात आहेत.