जामठी, ता. बोदवड – जामठी येथे शनिवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी ६ ते ७ दारू विक्रेते सऱ्हास अवैध दारू विक्री करत असल्याने आतापर्यंत ३० ते ३५ परिवार या दारूने उघड्यावर आणल्याने महिला व पुरुष शनिवारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आठवडी बाजारात अवैध दारू विक्री पाहून संतप्त महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. त्याचे रूपांतर तेथे ठिय्या आंदोलनात झाले. बोदवड येथून वरिष्ठ पोलिस अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. दुपारी दोनच्या सुमारास बोदवड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी बाजारात जाऊन तपासणी केली मात्र तोपर्यंत दारू विक्रेते पसार झाले होते. दरम्यान पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षक सुजित पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढली. तसेच गावात यापुढे दारू विक्री होऊ देणार नाही, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गावात अवैध दारू विक्री करण्यास मनाई केल्यानंतर विक्रेत्यांनी धमकी व शिवीगाळ केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता . श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग प्रमुख श्री विलाससिंह पाटील,उपाध्यक्ष महेंद्रसिंह पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, भरत पाटील यांनी मध्यस्ती करून वाद मिटवला व दारू विक्रेताने उपस्थितांची माफी मागितल्याने वाद मिटविण्यात आला.