मुंबई – देशातील प्रसिद्ध उद्योगपती,उद्योग क्षेत्रातील ‘बापमाणूस’ टाटा समुहाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.
मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला, अशीच भावना प्रत्येक भारतीय व्यक्त करत आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आज राज्यभरात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज दिनांक गुरुवार १०रोजी एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यांनी दिल्या आहेत. तसेच आज मुंबईमध्ये होणारे सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राज्य शासनाचे हे सर्व कार्यक्रम परवा घेण्यात येणार आहेत.