जळगाव,(प्रतिनिधी)- पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस महासंचालक यात फार मोठे अंतर आहे परंतु तुमच्यामध्ये इच्छाशक्ती,जिद्द असेल तर एक पोलीस कॉन्स्टेबल देखील डीजीपी वर त्याच्या कार्याची चिकित्सात्मक मांडणी करणारे पुस्तक लिहू शकतो हे विनोद अहिरे यांनी दाखवून दिले. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले.
जळगाव येथील सारनाथ बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे लिखित ‘काळजातील पोलीस महासंचालक’ हे पुस्तक जळगाव येथील भैय्यासाहेब गंधे सभागृहात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. सदर प्रसंगी होम डिवायएसपी प्रमोद पवार, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, साहित्यिक मिलिंद बागुल, शशिकांत हिंगोणेकर, सुषमा साळुंखे शांतिदूत संघटनेचे अध्यक्ष सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पांडे पुढे म्हणाले की, मी विचार सुद्धा केला नव्हता की एक कॉन्स्टेबल माझ्यावर पुस्तक लिहून प्रकाशित करेल. मी पोलीस महासंचालक पदावर असताना मी फक्त माझ्या अधिकारांचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच कर्मचारी वर्ग इतका प्रभावित झाला. कदाचित मी केलेलं कार्य भविष्यात लोक विसरले असते परंतु अहिरेंनी पुस्तक लिहिल्यामुळे त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे. विनोद अहिरे सारखे पोलीस खात्यामध्ये अनेक कर्मचारी आहे त्यांना जर प्रोत्साहन मिळाले तर नक्कीच काहीतरी वेगळं घडू शकतं. असे आपल्या मनोगतात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे म्हणाले.
विनोद अहिरे मनोगत मांडताना म्हणाले की संजय पांडे साहेबांनी पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार ज्या क्षणापासून स्वीकारला त्या क्षणापासून ते निवृत्तीच्या क्षणापर्यंत पोलीस हिताचा त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा, कुटुंबीयांचा विचार केला, साहेबांच्या अधिकारात जे निर्णय घ्यायचे होते त्यांनी जराही विलंब न करता त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याच बरोबर शासनाच्या अधिकारात जे निर्णय घ्यायचे होते ते शासनाला प्रस्ताव पाठवून ते मंजूर करून घेतले. त्यामध्ये विशेष करून अगोदर पोलीस खात्यामध्ये भरती झालेला कर्मचारी हा कर्मचारी म्हणून निवृत्त होत असे, आता पांडे साहेबांच्या पुढाकाराने प्रत्येक पोलीस कर्मचारी हा पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त होत आहे, याचा श्रेय संजय पांडे साहेबांना जाते. सदर प्रसंगी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी हे पुस्तक वाचावे असे आवाहन संजय पांडे यांनी केलेले आहे.









