नवी दिल्ली- झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सत्ताधारी भाजपला या निकालांनी मोठा झटका दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडी बहुमताकडं वाटचाल करत आहे. त्यामुळं अवघ्या दोन महिन्यात दुसरं राज्य गमावण्याची वेळ भाजपवर आली आहे. संघटनात्मक व प्रचाराच्या पातळीवर भाजपनं केलेल्या अनेक चुका या पराभवास कारणीभूत ठरल्या आहेत.
मित्र पक्षांना सांभाळून न घेण्याचे भाजपचे धोरण झारखंडमध्ये मारक ठरले. ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनशी असलेली युती भाजपनं अखेरच्या क्षणी तोडली. या युतीवर वेळीच निर्णय न झाल्यानं एकूणच प्रचारावर परिणाम झाला. याउलट विरोधकांनी वेळीच एकत्र येऊन समजुतीनं जागावाटप करून भाजपला टक्कर दिली.
नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, ३७० कलम अशा राष्ट्रीय मुद्दयांना भाजपनं निवडणूक प्रचारात अति महत्त्व दिलं. राष्ट्रीय नेत्यांनी केवळ याच मुद्द्यांवर भर दिला. स्थानिक प्रश्नांची चर्चाही केली नाही. दुसरीकडं महाआघाडीनं स्थानिक मुद्दे आणि आदिवासी हितांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि भाजपला फटका बसला.















