नाशिक – अजित पवार यांच्या सांगण्यावरून आपण राजभवनावर गेलो होतो. पक्षाचे गटनेते असल्याने त्यांचा आदेश पाळला. तिथे काय होणार आहे याची पुसटशी देखील कल्पना देण्यात आली नव्हती. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेसोबत आहोत. पक्ष सांगेल तो आदेश पाळला जाईल असा खुलासा आजच्या सत्ता नाट्याप्रसंगी आ. माणिकराव कोकाटे , निफाडचे आमदार दिलीप बनकर, दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
आज दि. २३ सकाळी राजभवनात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड व दिंडोरीचे आमदार अनुक्रमे आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर व नरहरी झिरवाळ हे उपस्थित राहिले होते. कोकाटे व बनकर याचे राजभवनातील उपस्थितीचे फोटो सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवरून व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या ३५ आमदारांचा गट असल्याची चर्चा होती. तर शपथविधीसाठी प्रत्यक्षात १५ आमदार उपस्थित होते. शपथविधी आटोपल्यावर आणखी तीन आमदार राजभवनावर दाखल झाल्याचे सांगण्यात येत होते. भल्या सकाळी शपथविधीचा बार उडाल्यावर महाविकास आघाडीत खळबळ होणे साहजिक होते. त्यात राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट अजितदादांसोबत असल्याच्या वृत्ताने सगळीकडेच संशयकल्लोळ उडाला होता.
अखेर शरद पवार यांनीच ट्वीट करून अजित दादा यांच्या निर्णयाशी राष्ट्रवादी सहमत नसल्याचे सांगत तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे असे म्हंटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सेना व काँग्रेस सोबत सत्तास्थापनेत सहभाग घेईल असे शरद पवारांनी जाहीर केल्यावर शपथविधीला हजर असणाऱ्या आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. नाशिकचे तीन आमदार राजभवनावर उपस्थित राहिल्याने त्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमे व कार्यकर्ते देखील पुढे झाले होते. मात्र या तीनही आमदारांचे भ्रमणध्वनी नॉट रिचेबल येऊ लागल्याने गुंतागुंत वाढली होती.
अखेर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियाचा आधार घेत नॉट रिचेबल असणाऱ्या कोकाटे, बनकर व झिरवाळ यांनी स्वतंत्रपणे भूमिका स्पष्ट केल्या. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या सोबत असून राजभवनावर होणाऱ्या कार्यक्रमाची आपणास कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.
गटनेते असणाऱ्या अजित पवार यांचा आदेश आल्याने आपण राजभवनावर गेल्याचे या आमदारांनी म्हटले आहे. त्यांच्या या खुलाशामुळे त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात तसेच जिल्हाभर सुरु असलेल्या उलटसुलट चर्चानादेखील पूर्णविराम मिळाला. पक्षाच्या भूमिकेनुसार आपली आगामी राजकीय वाटचाल राहिल असेही या आमदारांनी म्हटले आहे.














