मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागतो कि काय? अशी चिंता सतावत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्सचे तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल तासभर चर्चा सुरु होती. या चर्चेअंती तुर्तास राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे. मात्र, लॉकडाऊनऐवजी करोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते.
निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन न करण्यावर ठाम असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबईसह राज्यभरात मंगळवारी करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळाली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार, या चर्चांना ऊत आला होता. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १८४६६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तर २० जणांचा मृ्त्यू झाला. यापूर्वी सोमवारी नव्या करोना रुग्णांची संख्या तब्बल १२ हजार इतकी होती. मात्र, एकाच दिवसात नव्या करोना रुग्णांची संख्या आठ हजाराने वाढली आहे.