अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व येथील एका ९ वर्षीय बालकाचे अपहरण करून ४० लाखाची खंडणी मागण्याऱ्या ५ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.
याबाबत असे की, सोनू कुमार बारेतात त्यांची पत्नी सविता आणि ९ वर्षाचा मुलगा कृष्णा हे अंबरनाथ पूर्व भागात वास्तव्यास आहे. त्यांचा वडापावचा मोठा व्यवसाय आहे. दरम्यान, त्यांचा 9 वर्षाचा मुलगा कृष्णा हा 8 सप्टेंबरच्या सायंकाळी घरातून ट्यूशनसाठी निघाला. मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. घरच्या लोकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. तो कुठेही आढळून आला नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. दरम्यान कृष्णाचे काका सत्येंद्र यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने कृष्णाचे अपहरण केले असल्याचे सांगून मुलगा परत हवा असल्यास 40 लाख रुपये द्यावे लागतील, अशा शब्दांत खंडणीची मागणी केली.
या प्रकरणाची माहिती मिळताच ठाणे क्राईम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रांच, उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि अंबरनाथ पोलीस यांच्याकडून मुलाच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आले आणि तपास सुरु झाला. क्राईम ब्रांचचे अॅडीशन सीपी अशोक मोराले यांच्या नेतृत्वात क्राईम डिसीपी लक्ष्मकांत पाटील, उल्हासनगरचे डीसीपी प्रशांत मोहिते आणि सर्व पोलीस तासंतास या मुलाचा शोध घेत होते.
अपहरणकर्त्याचा पुन्हा फोन
या दरम्यान अपहरणकर्त्यांनी पुन्हा एकदा फोन केला. या फोननंतर पोलिसांनी तपासाचे सूत्र हलविले. या फोननंतर पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फूटेज लागले. त्यामध्ये मुलगा आरोपींच्यासोबत जात असल्याचे दिसून आला. मुलाच्या वडिलांनी देखील आरोपींची ओळख पटवून सांगितली. तांत्रिक बाबींच्या आधारे कल्याण नजीकच्या मोहने परिसरात छापा टाकत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपी हे मुलाच्या ओळखीचे
अखेर लहान मुलगा कृष्णाची आरोपींच्या तावडीतून सूटका झाली. पोलिसांनी आरोपी छोटू सिंग, अमजद खान, योगेंद्र सिंग आणि आणखी एकाला अटक केली आहे. हे सर्व आरोपी मुलाच्या वडिलांच्या ओळखीचे होते. कृष्णा देखील त्यांना ओळखत होता. तीन दिवस आरोपींनी मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. आरोपी हे मुलासोबत फ्रेंण्डली वागत होते. त्याला त्रास देत नव्हते. त्यामुळे मुलावर जास्त ताण आला नाही.
मुलगा ट्यूशनला गेला असता तुझे आई-वडील आजारी आहेत. तू एकटाच घरी राहू शकत नाही, असे बोलून एक आरोपी मुलाला आपल्या घरी घेऊन गेले होता, अशाप्रकारे मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांमुळे मुलगा त्याच्या कुटुंबियांना परत मिळाल्याने त्याच्या पालकांचा सूटकेचा श्वास सोडला. मुलाच्या वडिलांनी पोलिसांचे मनापासून अभिनंदन केले.















