जळगाव : २०१९-२० या आर्थिक वर्षात केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवल्याबद्दल रावेर तालुक्यातील चार तर मुक्ताईनगरातील दोन अशा सहा बँकांवर शुक्रवारी कृषी विभागाने गुन्हे दाखल केले. रकमा अदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीनवेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही बँकांनी दुर्लक्ष करत पीक विम्याचा पैसा अदा केला नाही. शेवटी कृषी विभागाने ही धडक कारवाई केली.
या प्रकरणी तालूका कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. फिर्यादीत श्री भामरे यांनी म्हटले आहे की, २०१९-२० वर्षात एग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीने केळी पीक विमा काढला होता. मात्र ३७ शेतकऱ्यांची माहिती व विहीत वेळेत इंडियन ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या पोर्टलवर भरली नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा भरपाईच्या लाभापासून वंचित राहिले.
यांच्यावर गुन्हे दाखल
यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खानापूर शाखा, आयसीआयसीआय बँक, रावेर शाखा आणि बँक ऑफ बडोदा, रावेर शाखा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २ केळी उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरतांना चुकीचे महसूल मंडळ पोर्टलवर भरल्यामुळे बँक ऑफ बडोदा, सावदा शाखा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया,सावदा शाखा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या सर्व शेतकऱ्यांना मिळून ९१ लाख ८२ हजार १८५ रुपये पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित करण्यात आले असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व बँकांना संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत ३ वेळा विचारणा करण्यात आली आणि मुदतवाढ देऊनही बँकांनी भरपाई दिली नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. एकूण ११ बँकां विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते मात्र अन्य बँकांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची पूर्तता करून दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान या दाखल केलेला गुन्हयामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.