चाळीसगाव : जुन्या वादाच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा येथे घडली. प्रविण नारायण जाधव (वय-२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ग्रामीण पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील करगाव तांडा क्र.३ येथील प्रविण जाधव याने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान मयताचा भाऊ अरविंद नारायण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रविण नारायण जाधव व उमेश पांडुरंग राठोड, राकेश पांडुरंग राठोड, राजेश पांडुरंग व छापाबाई पांडुरंग राठोड यांच्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून उमेश पांडुरंग राठोड, राकेश पांडुरंग राठोड, राजेश पांडुरंग व छापाबाई पांडुरंग राठोड या चौघांकडून प्रविण नारायण जाधव यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती.
त्यामुळे जुन्या वादाच्या कारणावरूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे आरोप घरच्यांनी केले आहेत. भाऊ अरविंद नारायण जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३०६, ३४ प्रमाणे वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत.