मुंबई,(प्रतिनिधी) पालघर प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांचे कान टोचत आज सकाळी 9. 30 वाजता पालघर प्रकरणातील अटकेत असलेल्या 101 आरोपींची नावे जाहीर केली आहे. असे त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
पालघर प्रकरणावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.
ही नावे त्यांच्यासाठी जी धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात होती, असं म्हणत अनिल देशमुख यांनी 101 आरोपींच्या तीन याद्या ट्विट केल्या आहेत. यामध्ये एकही आरोपी हा मुस्लिम नसल्याचा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी तसे सकाळी बोलूनही दाखवले.
काहीजण पालघर प्रकरणी राजकारण करत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की ताब्यात घेतलेल्या 101 जणांपैकी एकही मुस्लिम नाहीये. त्यामुळे या प्रकरणावरून कृपया राजकारण करू नका. जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. सध्या ही वेळ राजकारण करण्याची नाही, अशा शब्दात त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विरोधकांचे कान टोचले.
दरम्यान, सध्या संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध लढाई देत आहे. मात्र ही लढाई लढत असताना पालघरला अतिशय दुर्दैवी घटना घडली. पालघरची घटना घडल्यानंतर 8 तासात 101 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसंच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द केला आहे, अशी माहिती त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली