रावेर – श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी रावेर या सी बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जळगांव तर्फे शाळेत आपत्कालीन रंगीत तालिम (प्रशिक्षण) संपन्न झाले. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार होत. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडतात. अशा आपत्तीमध्ये जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. हा कार्यक्रम सरकार तर्फे जरी राबवला जात असला तरी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. शाळेमध्ये अचानक कोणतीही आपत्ती आली तर त्यापासून विद्यार्थ्यांनी संरक्षण स्वत: करावे, यासाठी त्यांनाही प्रशिक्षणाची गरज आहे. शाळेत आपत्ती व्यवस्थापन शाळेची प्राथमिक माहिती, शाळेत आपत्ती व्यवस्थापन समिती, इमारतीचा रचना, शाळेच्या मैदानाची विस्तृत माहिती, शाळेची दिनचर्या, शाळेची रंगीत तालीम, शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा, आपत्कालीन संपर्क क्रमांक इ. विस्तृत व्यवस्था शाळेकडे हवी.
शाळेत आपत्कालीन रंगीत तालिम (प्रशिक्षणाच्या) कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शाळेचे प्रशासक किरण दुबे, प्राचार्या सौ कविता शर्मा, व्यवस्थापक गजानन महाजन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक एन पी रावळ, वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव उपाध्यक्ष समिष काबळे, आकाश चौधरी, अर्जुना संस्था पुणे सदस्य योगिनी श्रीवास्तव, अक्षय राजनकर भुसावळ, चेतन बोरनारे, वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव भगवान पाटील उपस्थित होते.
आपत्कालीन रंगीत तालिमच्या सुरूवातीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापक श्री एन पी रावळ यांनी आपत्तीपासून स्वत:चे व दुसऱ्याचेही संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्तीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याचे मार्गदर्शन केले. दहशतवादी हल्ला, भुकंप, आग इ. आपत्ती पासून संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकही करून दाखविले व प्रशिक्षण ही दिले तया त स्ट्रेचर व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, दोरीला गाठ मारून वरून उतरणे, गोणी पासून, दोरीपासून स्टेचर तयार करणे, शीडीवर उतरणे, आग विझवणे, रोपवेच्या सहाय्याने मदत करणे इ. चित्तथरारक प्रात्यक्षिक आलेल्या प्रशिक्षिक सदस्यांनी केले. भूकंप झाल्यावर आपण वर्गात असतांना स्वत:ला कसे वाचवावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासक, प्राचार्या, व्यवस्थापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.















