बारामती – राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील वर्चस्वाला शरद पवारांच्या एकेकाळचे निष्ठावंत असणार्या चंदरराव तावरे यांनीच धक्का दिला होता. मात्र त्यानंतर गेली पाच वर्षात शरद पवार कारखान्यात गेले नव्हते. मात्र या निवडणुकीनंतर शरद पवारांना सन्मानाने कारखान्यात आणू असा शब्द अजित पवारांनी दिला होता. त्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलने बाजी मारली असल्याने कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. मात्र सहकार बचाव गटांच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली आहे. त्यामध्ये चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला यश मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळवून माळेगाव कारखाना ताब्यात घेतला आहे. मात्र चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला चिटपट करण्यात पवारांना यश आले नाही. गेल्या पंचवार्षकि निवडणुकीत साखर उद्योगातील ज्येष्ठ तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेवृत्वाखालील शेतकरी बचाव सहकारी पॅनेलने एकूण एकवीस जागांपैकी पंधरा जागेवर घवघवीत यश मिळवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली. अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले. मात्र यावर्षी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेलने एकवीस जागांपैकी सतरा जागेवर घवघवीत यश मिळविले आहे. तर शेतकरी बचाव सहकारी पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.
मतमोजणीला साडेतीन तास उशीर झाल्यामुळे रात्रभर मतमोजणीची प्रक्रीया सुरु होती. आज सकाळीही मतमोजणी पूर्ण करुनच यंत्रणा थांबणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान सांगवी आणि नीरावागज या गटामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुन्हा मतमोजणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे येथे पुन्हा मतमोजणी घेण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने माहिती दिली.















