मुंबई – अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी भूखंड देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
अयोध्येत बुद्ध मंदिर उभारण्यासाठी जवळपास २० एकर जागा दिली जावी, अशी आमची मागणी आहे. यासंबंधी लवकरच योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ, असंही आठवले म्हणाले. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं दिला. ती जागा हिंदूंची असल्याचा निकाल न्यायालयानं दिला होता. त्यामुळं त्या जमिनीवर राम मदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तसंच मुस्लिमांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही न्यायालयानं सरकारला दिले होते. निकालात राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार राम मंदिर उभारणीसाठी आता ट्रस्टची स्थापना केली आहे. दरम्यान, आता अयोध्येत बुद्ध मंदिर उभारण्यासाठी भूखंड देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आमच्या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही ट्रस्ट स्थापन करून अयोध्येत जमीन घेऊन तिथे बुद्ध मंदिर उभारू, असंही त्यांनी सांगितलं.














