मुंबई – भाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपाचं माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार खंडन केलं आहे. ‘राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा,’ असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं आहे.
मागील सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. गृह खात्यानं सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करण्याचं ठरविलं आहे. या संपूर्ण प्रकरणावरून सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी भाजपला धारेवर धरलं आहे. फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर, फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं मला दिली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘राज्य सरकारनं तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. जे आरोप करताहेत, त्यांची विश्वासार्हता किती आहे हे त्यांनाही माहीत आहे. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही आपली संस्कृती नाही. तरीही सरकारला चौकशी करायची असेल तर ती तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा. महाराष्ट्राच्या जनतेला सत्य माहीत आहे. आमच्या सरकारमध्ये गृहराज्य मंत्री खुद्द शिवसेनेचेच होते,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फोन टॅपिंगसाठी व व्हॉट्सअॅप मेसेज अनधिकृतरित्या पाहण्यासाठी इस्रायली कंपनीकडून ‘पेगॅसस’ ही प्रणाली विकत घेण्यात आली होती. त्यासाठी काही अधिकारी इस्रायलला गेल्याचा आरोप होता. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘इस्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर सरकारनं करावी,’ असं ते म्हणाले.