जळगाव,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. यात २२९ जागा जिंकून स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळ निवडीसाठी नावे अंतिम करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.दरम्यान महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे बुलंद तोफ गुलाबराव पाटीलांना मोठ्या खात्याच्या मंत्रिपदासह जळगाव जिल्ह्याचे पुन्हा पालकमंत्री वर्णी लागण्याची शक्यता बळावली असल्याची माहिती आहे.
गुलाबराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात पाणी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून चांगली कामगिरी केली असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील उत्तम कामगिरी केली आहे.तसेच त्यांची भूमिका नेहमीच महायुतीमध्ये समन्वय साधणारी राहिली आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपा नेते गिरीष महाजन यांच्याशी असलेले चांगले संबंध यामुळे गुलाबराव पाटील यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपदासह जळगाव जिल्ह्याचे पुन्हा पालकमंत्री वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.
जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळण्याचे संकेत आहेत. त्यात विद्यमान मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद पुन्हा मिळण्याबाबत शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे राज्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा निवडून येणारे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार सुरेश भोळे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
महायुतीला मतदारांनी सत्ता स्थापनेची संधी दिली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी या दोन दिवसाच्या काळात होणाऱ्या हालचालीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याला मिळणाऱ्या तीन कॅबिनेट मंत्रीपदासह राज्य मंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत
जळगाव जिल्ह्यात सर्वच जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाची मोहर लावली आहे. त्यामुळे साहजिक जिल्ह्याला मंत्रीपदासाठी झुकते माप मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. राज्य मंत्री पदाच्या शर्यतीत भाजप आमदार सुरेश भोळे, एक शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शर्यतीत आहेत. यापैकी कोणाला राज्यमंत्री पद मिळणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.