पुणेः राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाचे महाआघाडीचे सरकार सत्तेवर आले असले तरी हे तीन चाकाचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले आहे. कमी आमदार असतानाही राज्यात सरकार कसे बनवले जाऊ शकते, हे मी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून शिकलो आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी १०५ आमदार असलेल्या भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे.
पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सहकार मंत्री तथा अर्थमंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार अजित पवार, कलप्पा आवाडे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, इंडियन शुगर इन्सिट्यूटचे अध्यक्ष रोहित पवार, बाळासाहेब पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत व्हीएसआयच्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकारच्यावतीने एक तज्ज्ञांची समिती स्थापन करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.














