मुंबई- राज्यातील पोलिसांची वेतन खाती अॅक्सिस बँकेकडे वर्ग करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बदलणार असल्याचं वृत्त आहे. साधारण दोन लाख पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती अॅक्सिस बँकेतून पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेत वर्ग करण्यात येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा निर्णय झाल्यास अॅक्सिस बँकेचं मोठं नुकसान होणार आहे.
राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतन खाती अॅक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. यावरून फडणवीस यांच्यावर अनेकदा आरोप झाले होते. फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करतानाच, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी त्यावेळी केली होती. तर त्यावर २००५ सालीच पोलिसांची वेतन खाती ही अॅक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय झाला होता, असा दावा त्यावेळी फडणवीस यांनी केला होता. मात्र, तो दावा खोटा आहे. त्यावेळच्या शासननिर्णयात ही खाती एकट्या अॅक्सिस बँकेत वर्ग करण्यात यावीत, असे म्हटले नव्हते. मात्र, २०१७मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस मुख्यालयातून परिपत्रक काढून पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. फडणवीस यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. पाच वर्षांत फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग करून अॅक्सिस बँकेला मदत केली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.















