म्हणाली- देशातील सच्च्या नागरिकांना नागरिकत्वाचे पुरावे मागणाऱ्या कायद्याचा निषेध
कोलकाता – पश्चिम बंगालच्या जाधवपूर विद्यापीठातील दीक्षांत समारंभामध्ये मंगळवारी एमएची डिग्री घेतल्यानंतर विद्यार्थिनीने नागरिकत्व कायद्याची प्रत फाडली. इंटरनॅशनल रिलेशन्सची विद्यार्थिनी असलेली देबोस्मिता चौधरी हिच्या मते- ही तिची विरोध करण्याची पद्धत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार, देशातील सच्च्या नागरिकांनाच येथे राहण्यासाठी नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यामुळेच, ती कायद्याला विरोध करत आहे.
सीएएची प्रत फाडताना कुलगुरू, उप-कुलगुरू आणि रेजिस्ट्रार सुद्धा उपस्थित होते. यानंतर विद्यार्थिनीने “आम्ही कागदपत्रे दाखवणार नाही. इन्कलाब झिंदाबाद…” अशा घोषणा दिल्या. सोबतच, आपण विद्यापीठाचा अपमान करत नाही. आपल्या आवडकत्या विद्यापीठातून डिग्री घेऊन मला गर्व आहे. केवळ सीएएला विरोध करण्यासाठी आपण असे केल्याचे ती पुढे म्हणाली. यानंतर तिच्या समर्थनात इतर 25 विद्यार्थी डिग्री घेण्यासाठी मंचावर गेलेच नाहीत.
तत्पूर्वी मंगळवारी दुपारी विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना घेराव टाकला होता. तसेच विद्यापीठात प्रवेशच करू दिला नाही. ते विद्यापीठातील दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. परंतु, विद्यार्थ्यांनी त्यांना कारमधून सुद्धा उतरू दिले नाही. याच दरम्यान, विद्यार्थ्यांनी त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवले होते. राज्यपाल सीएएला एखाद्या भाजप नेत्यासारखे समर्थन करत असून राजभवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय बनले आहे अशी टीका या विद्यार्थ्यांनी केली होती.















