नागपूर- ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबाबतची भूमिका शिवसेनेने कालच स्पष्ट केली आहे. सावरकरांबाबतची आमची भूमिका कायमच आहे. त्यात बदल होणार नाही. पण सावरकरांवरून आम्हाला जाब विचारणाऱ्यांनी आधी सावरकरांच्या तत्वांविरोधातील नागरिकत्व विधेयक कायदा का आणला? याचं उत्तर द्यावं,’ असा सवाल करतानाच ‘केंद्र सरकारने नको त्या गोष्टी उकरून काढून देशातील मूळ प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा डाव आखला आहे,’ अशी टीका मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे आज केली.
नागपूर येथे उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील ठाकरे सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर नागरिकत्व कायदा आणि विकासकामांना देण्यात आलेली स्थगिती आदी मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. सावरकरांनी सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंत हा देश एकसंघ राहील अशी भूमिका मांडली होती. तुम्ही सावरकरांना मानता मग पाच वर्षे तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही देश एकसंघ करण्यासाठी काय केले? इतर देशातील पीडित अल्पसंख्याकांना तुम्ही भारतात बोलवून त्यांना तुम्ही असुरक्षितच करत आहात. हा सावरकरांच्या विचारांशी द्रोह नाही का? इतर देशातील पीडितांना भारतात आणण्यापेक्षा पीडित अल्पसंख्याकांचा छळ करणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला सक्त ताकीद देण्याची हिंमत का दाखवली नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.