मुंबई- नवीन सरकार आल्यानंतर जुन्या सरकारमधील अधिकाऱ्यांना हटवून तेथे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना आणले जाते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्यासाठी त्यांनी विकास खरगे आणि भूषण गगराणी या दोघांवर जबाबदारी टाकली, विशेष म्हणजे हे दोन्ही अधिकारी फडणवीस सरकारमध्येही उच्च पदांवरच होते. या दोघांसह अन्य पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या.
विकास खरगे हे फडणवीस सरकारमध्ये वन विभागाचे प्रधान सचिव होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात घेऊन त्यांच्यावर प्रधान सचिवपदाची जबाबदारी सोपवली. विकास खरगे हे १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी देशात ३४ वा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीसाठीही पुरस्कृत करण्यात आले आहे. भूषण गगराणी यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयडीच्या जबाबदारीतून मुक्त करून मुख्यमंत्री कार्यालयात आणले होते. त्यांनीही आपले काम चोखपणे बजावल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची बदली न करता त्यांच्यावर पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस सरकारमधील अधिकाऱ्यायांवर विश्वास दाखवल्याने ही दुर्मिळ बाब असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
डॉ. विनायक निपुण यांची मुंबई महापालिकेत बदली
२००१ च्या बॅचचे डॉ. विनायक निपुण यांची औरंगाबाद महापालिकेतून मुंबई महानगरपालिकेत आयुक्त, संचालकपदी नियुक्ती केली. आनंद रायते यांनी विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तपदी, अमोल येडगे यांची अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली.