मुंबई – राज्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून काका शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अजित पवार यांच्या बंडखोरीने खळबळ माजली आहे. भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे अजित पवारांचं मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे. अजित पवार हे राजकारणातले दोन चाणक्य भाजपाध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आता चांगलेच अडकले आहेत. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती अजित दादांसाठी झाली आहे.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवारांनी पूर्ण ताकद लावली आहे. तर अमित शाहांनीही मोठी खेळी खेळत अजित पवारांना सोबत घेण्यात यश मिळवलं. अजित पवारांचा शपथविधी आटोपला असला तरी आता बहुमत चाचणीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. अजित पवारांसोबत ३५ आमदार असल्याचं सांगितलं जात होतं. पण राष्ट्रवादीसोबत ५४ पैकी ५२ आमदार असल्याचा दावा पक्षाने केला. शरद पवार यांच्या गटाने सोमवारी राजभवनात जाऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या १६२ आमदारांची यादी सोपवली.
अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण अजित दादा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. जाणकारांच्या मते, अजित दादांसमोर एक मोठं संकट उभं आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) २५ हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्यात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स पाठवणं सुरू करणार आहे.















