जळगाव- कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये विचारांची दरी असतेच. बदलत्या काळाशी जुळवून घेताना करावी लागणारी अॅडजस्टमेंट करण्यासाठी सहसा कोणतीही पिढी आपणहून पुढाकार घेत नाही. ‘आमची पिढी म्हणते तेच बरोबर’ असं वैचारिक सूत्र वेगवेगळ्या कालखंडामध्ये वावरणारी माणसं सातत्यानं समोरच्या व्यक्तीला सांगत असतात. ‘जनरेशन गॅप’मध्ये मनाची ही विचित्र अवस्था या नाटकाच्या माध्यमातून अनुभवली जाते.
अभिषेक मुजुमदार लिखीत कौमुदी या हिंदी नाटकाचे मराठी रुपांतरण विठ्ठल सावंत यांनी केले आहे. रंगभूमीवर ज्येष्ठ असलेल्या सत्यशील यांची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा पंकजदेखील रंगभूमीवर काम करतो. या दोघांना भेटायला एकमेकांचे भूत येते. पण प्रत्यक्षात ही मेलेली व्यक्ती नसून तो मनातला एक आभास आहे. या नाटकात नाटकातले नाटकही घडते. त्यात एकलव्य व अभिमन्यू ही दोन पात्र व वास्तव जीवनातील सत्यशील व पंकज ह्या दोन व्यक्ती यांच्यातील द्वंद्वं दाखविण्यात आले आहे. हे द्वंद्व कुठल्या परिणामांपर्यंत जाऊ शकते हे दाखविणारे नाटक म्हणून अर्जुन ते अभिमन्यू नाटक आहे.
या नाटकात गणेश सोनार (सत्यशील व एकलव्य), शुभम सपकाळे (पंकज, अभिमन्यू), कुलदीप भालेराव (मॅनेजर व केशव), भावेश पाटील (रघू), योगेश लांबोळे (अर्जुन व पुरुष1), आकाश भारंबे (दुर्योधन व धनावडे), सरिता तायडे (कामिनी, सुभद्रा व स्त्री 1), अक्षय जाधव (पुरुष 2), पुर्वेश वाणी (लहान पंकज), मयुर भंगाळे, चेतन नागरे, श्रीकांत डाभे, संकेत राऊत, दिपक कोळी, सचिन भावसार, मनोज पाटील, कमलेश भोळे (सैनिक) यांनी अभिनय केला तर तांत्रिक बाजूत अंकुश काकडे (प्रकाशयोजना), सागर सदावर्ते (रंग व वेशभूषा), रोहिणी निकम, दिपक भुसारी (पार्श्वसंगीत) तर निर्मितीप्रमुख अमोल जाधव हे होते.














