मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2022 वर्षातील शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतील 5 नेत्यांची नावं घेत नव्या लढाईची घोषणा केली आहे. इशारा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी किरीट सोमय्या एक्शन मोडमध्ये आले असून उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ते पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंविरोधात देवरंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी १९ बंगले घोटाळ्याचा आरोप करत यामध्ये रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात हा व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबद्दल रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले. त्या विरोधात आज आम्ही रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत, असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान किरीट सोमय्या यांनी काल याबद्दलचे एक सुचक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी नव्या वर्षात शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचे गैरव्यवहार उघड करण्याचा इशारा दिला होता. आता ते दुसऱ्याच दिवशी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.