अमळनेर – विभागीय खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. साहित्यिक व रसिकांच्या स्वागतासाठी भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी हे पू. साने गुरुजी साहित्यनगरीत होणार्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.राजेंद्र गवस हे उद्घाटक, तर साहित्यिक अशोक कोळी हे संमेलनाध्यक्ष असतील.
दि.23 व 24 नोव्हेंबर या दोनदिवसीय विभागीय खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक पू. साने गुरुजी सार्व. ग्रंथालय व मोफत वाचनालय आहे. संमेलनाच्या अंतिम तयारीची आढावा बैठक ग्रंथालयात नुकतीच झाली. त्यात कार्यक्रम यशस्वितेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या.
लोकसंस्कृती व साहित्यिक परंपरेचे देखावे आणि आकर्षक चित्ररथाने सज्ज अशा ग्रंथदिंडी सोहळ्याने सुरुवात होणाऱ आहे. या संमेलनात साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बैठकीत ग्रंथालयाचे सचिव प्रकाश वाघ यांनी प्रास्ताविकात, नियोजन समित्यांची माहिती देत पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. या वेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रमेश पवार यांनीही साहित्य परंपरेला साजेसे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी पत्रकार उमेश काटे, ईश्वर महाजन व विजयसिंग पवार, विजया गायकवाड यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न होणार्या या संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रामुख्याने ग्रंथदिंडी, नाट्यगृह व रंगमंच सजावट, प्रचार व प्रसार, निवास व भोजन, व्यवस्थापन व स्वागत अशा विविध समित्यांचा समावेश आहे.
या वेळी नगीनचंद लोढा, डॉ.शैलजा माहेश्वरी, अॅड.तिलोत्तमा पाटील, अनिल घासकडबी, अरुण सोनटक्के, भीमराव महाजन, नरेंद्र पाटील, विकास ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.














