नवी दिल्ली- संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भाजपनंही शिकायला हवं, असं मोदी म्हणाले.
राज्यसभेच्या ऐतिहासिक २५० व्या अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहाला संबोधित केलं. संसदेचे हे वरिष्ठ सभागृह देशाच्या संघराज्यीय रचनेचा आत्मा आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचं कौतुक केलं. ‘सभागृहात अडथळे निर्माण करण्यापेक्षा आपण संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे. याबाबतीत एनसीपी आणि बीजेडीचं कौतुक करायला हवं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. हे या दोन्ही पक्षांचे वैशिष्ट्य आहे,’ असं ते म्हणाले. या दोन पक्षांकडून सर्व राजकीय पक्षांनी शिकायला हवं. भाजपनंही या पक्षांकडून धडा घ्यायला हवा. यासाठी या दोन्ही पक्षांचे आभार मानायला हवेत. जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हाही हे दोन्ही पक्ष काम करत होते. मात्र, या दोन पक्षांनी या बाबतीत एक चांगला आदर्श घालून दिला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.















