मुंबई: काँग्रेसशी योग्य दिशेनं चर्चा सुरू झाली आहे. चर्चेअंती जो काही निर्णय होईल, तो योग्य वेळी सर्वांना कळेल, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज काँग्रेस नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर दिली.
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचाच असा निर्धार केलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपला वगळून सत्तासमीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनंही यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळंच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्याशी चर्चेतनंतर आता उद्धव यांनी राज्यातील नेत्यांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये आज उद्धव यांची काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व विनायक राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमाविषयी चर्चा झाल्याचं समजतं. यात तिन्ही पक्षाच्या एकत्र येण्याचा समान धागा काय असेल, यावर प्रामुख्यानं चर्चा झाल्याचं समजतं.