मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच आणखीनच वाढला आहे. भाजप आणि शिवसेनेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. आता शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं समजतं. त्याआधी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, ती वाढवून दिली नाही असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपने यापूर्वीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळं राज्यात सरकार स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्याविषयी राजकीय तज्ज्ञांकडून विविध समीकरणं मांडली जात आहेत.