मुंबई: गेल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा पावसाने बरसायला सुरवात केली आहे. येत्या चार दिवसांत राज्यातील उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व आणि पश्चिम विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरु असल्याने सखल भागांना तलावाचे स्वरूप आले आहे. सकाळी कामाच्या वेळी रस्ते वाहतुकीवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला तर बस आणि लोकल वाहतूक 5 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, मुंबईत पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार ‘पावसाची शक्यता असून वारे 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या
सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे 29 झाडे आणि फांद्या कोसळल्या तर तीन ठिकाणी घर आणि घराचा काही भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. या सर्व घटनांत कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.
पुरात गाडी वाहून गेली
7 आणि 8 ऑगस्टला अमरावतीच्या अनेक भागात दमदार पाऊस बरसला आहे. यात माळू नदीला मोठा पूर आला आहे. माळू नदी भरून वाहत आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने सालबर्डी येथे भाविकांची मोठी रिघ असते. यातच भाविक माळू नदीच्या बाजूला गाड्या उभ्या करून मंदिरात प्रवेश करतात. अशीच गाडी पुलाच्या बाजूला उभी असताना पुराच्या पाण्यात वाहून गेली.