वाटाघाटीदरम्यान शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भाजपने शिवेसनेला दिलेच नव्हते, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मात्र तूर्तास प्रतिक्रिया देण्याचे टाळत सावध भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यावर फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच बोलतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
तर भाजपवरचा विश्वास उडेल’
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला जे आश्वासन दिले होते, ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा भारतीय जनता पक्षावरील विश्वास उडेल, असे वक्तव्य शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिवसेना-भाजप हे एक कुटुंब असून भाजप मात्र कुटुंबासारखे वागत नाही, मात्र दोघांनी एकत्र राहणे यातच राज्याचे कल्याण आहे असेही केसरकर म्हणाले. भाजप आश्वासनानुसार वागला नाही, तर देशात चुकीचा संदेश जाईल, असेही केसरकर म्हणाले.
अमित शहांचा मुंबईदौरा रद्द
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे उद्या मुंबईत येणार होते. शहा मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार होते. या भेटीत भाजप-शिवसेनेदरम्यान सुरू झालेला सत्तास्थापनेचा पेच सुटेल असे म्हटले जात होते. मात्र अमित शहा यांनी आपला मुंबई दौरा रद्द केला आहे. यामुळे तूर्तास शहा-ठाकरे भेट टळली असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले नव्हते असे खळबळजनक वक्तव्यानंतर अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याचे वृत्त आल्याने भाजप-शिवसेनेदरम्यानचे संबंध अधिक ताणले गेल्याचे संकेत मिळत आहेत.
आज संध्याकाळ नंतर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची बैठक?
मुंबई: भारतीय जनता पक्षाने ५०-५० च्या फॉर्म्युल्याचे वचन देत शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले असून आपल्या वचनाला भाजपने जागावे असे शिवसेनेकडून सतत बोलले जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असे वचन दिले नसल्याचे स्पष्ट करत खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेला ५०-५०च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भारतीय जनतापक्षाने कधीन दिलेले नव्हते, अशा स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी म्हटले आहे. आपण स्वत: अमित शहा यांना फोन करून असे आश्वासन शिवसेनेला दिले का, असे विचारले असता, शहा यांनी आपण असे आश्वासन शिवसेनला दिले नसल्याचे शहा यांनी म्हटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेनेच्या संबंधांमधील दरी आणखी वाढली असून आता शिवेसनेची प्रतिक्रिया काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.















