- मुक्ताईनगरात महायुतीच्या महारॅलीला प्रचंड प्रतिसाद – ग्रामस्थांनी केली रोहिणीताई खडसेंवर आशिर्वादाची पुष्पवृष्टी

मुक्ताईनगर – गेल्या ३० वर्षापासून मुक्ताईनगर मतदार संघावर नाथाभाऊंनी प्रत्येक गावात सर्व समाजाला सोबत घेऊन कोट्यावधीची विकास कामे केली असून सामाजिक सलोखा जोपासला आहे. गावागावांत सुखदुःखाचे ऋणानुबंध आहेत. राजकीय मतभेद न ठेवता विकास कामालाच आम्ही प्राधान्य दिले आहे. गेल्या ५ वर्षापासून मी देखील नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांनाच महत्व दिले आहे. भाजपाने रोहिणीताई खडसेंना अधिकृत उमेदवारी दिली असून त्या भाजप, शिवसेना, रिपाई (आठवले गट), रयत क्रांती संघटना, रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार आहेत.
विकास कामांच्या मुद्यावरच आम्ही मतदारांना आशिर्वाद देण्याचे आवाहन केले असून सर्वांनी विकास कामांच्या पाठीशी उभे राहावे आणि २१ तारखेला अॅड.रोहिणीताई खडसेंना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन महारॅलीप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांनी मतदार तथा शहरवासियांना केले.
आज (दि.19) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मुक्ताईनगर शहरात महायुतीच्या उमेदवार अॅड.रोहिणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खासदार रक्षाताई खडसे यांच्या समवेत भाजपा पदाधिकारी, नगर पंचायतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय बांधवांनी महारॅली काढली तसेच कोथळी व सालबर्डी येथे जनआशिर्वाद प्रचाररॅली काढण्यात आली. या महारॅलीला अभूतपूर्व असा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी अॅड. रोहिणीताईवर आशिर्वादाची पुष्पवृष्टी केली, हा विजयीरुपी कौलच मानला जात असून मुक्ताईनगर मतदारसंघात कमळच फुलणार, अशी चर्चा नागरिकांत होती.
यावेळी ठिकठिकाणी बोलताना अॅड.रोहिणीताईंनी सांगितले की, नाथाभाऊंनी विकासगंगा मुक्ताईनगर मतदारसंघात आणली आहे. आता या गंगेचे पात्र विस्तारण्याचे कार्य मला करायचे आहे. गावागावातील संपर्क वाढवायचा असून, नाथाभाऊंनी जे मतदारसंघातील प्रत्येक गावासाठी जे विकासाचे नाते दृढ केले आहे ते वृध्दिंगत करण्याचे कार्य मला करायचे. मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून जनसंपर्क वाढविण्यासोबतच विकासाची परंपरा जपण्याची मी आपणा सर्वांना ग्वाही देते.
शहरातील विविध भागातून महायुतीची महारॅली निघाली त्याप्रसंगी उमेदवार अॅड.रोहिणीताई खडसे, खासदार रक्षाताई खडसे, रासप जिल्हाध्यक्ष रविंद्र पवार, रिपाई तालुकाध्यक्ष सुधाकर बोदडे, युवक अध्यक्ष विक्रम हिरोळे, भाजपा शहराध्यक्ष मनोज तळेले, जिल्हाचिटणीस राजू माळी, जिल्हाउपाध्यक्ष विलास धायडे, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनिषा पाटील, जि.प.सदस्य निलेश पाटील, जयपाल बोदडे, माजी सरपंच पुष्पताई खेवलकर, नगरसेवक ललित महाजन, डॉ. प्रदिप पाटील, निलेश शिरसाठ, सौ. कुंदा पाटील, संतोष कोळी, शबानाबी आरिफ आझाद, नुसरतबी महबूब खान, बिल्किसबी खान, शमीम अहमद खान, मुकेश वानखेडे, पियुष मोरे, साधना ससाणे, बिलकीसबी बागवान, शे. शकील खाटिक, शे. मस्तान इमाम, अनिल पाटील, प्रविण पाटील, बापू ससाणे, आसिफ बागवान, आरिफ आझाद, आमीन खान, दत्ता जोगी, संजय कोळी, अंकुश पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. महारॅलीत युवक व महिलांची संख्या लक्षणीय होती.















