चाळीसगाव : दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने चाळीसगावमधील तितूर व डोंगरी नदीला पूर आला आहे. तितूरला गत ३२ दिवसात सहाव्यांदा पूर आला आहे.
तालुक्यात यावर्षी अभूतपूर्व असे विक्रमी पर्जन्यमान झाल्याने जवळपास ८८ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचा चेंदामेंदा झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री कन्नडसह पाटणादेवी जंगल परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने डोंगरी नदीलाही पूर आला. त्यामुळे शेतांमधील पाण्याचा निचरा होणे थांबले असून शेत शिवार जलमय झाले आहे.
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अति पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले खरिप पिकांचे नुकसानीमुले शेतकरी हवालदील झाला आहे.
दरम्यान, पाचोरा-जळगाव मार्गावरील वडली गावाजवळील पुलाचा भराव शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. गत आठवड्यातही याच पुलाचा भराव वाहून गेला होता. या पुलाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने आठ दिवसाच्या आत दोन वेळा वाहतुक ठप्प होवून त्याचा त्रास प्रवाशांना करावा लागत आहे.