जळगाव,(प्रतिनिधी)- संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना वायरस मुळे संपूर्ण देश व महाराष्ट्र थांबल्यासारखा झाला आहे. त्यामुळे विविध स्तरावरील नागरिकांना त्रास सहन कारावा लागत आहे.कुंभार समाजातील माती काम करणारे कारागिर ह्यांची गाडगी,माठ,परळ,ह्यांची विक्री उन्हाळ्यात होणाऱ्या विक्रीवर अवलंबून असते,मागील 4 महिन्यापासून बनवून ठेवलेले माठ,मडकी,गाडगी,परळ हे आता विक्री साठी तयार झालेले असतात परंतु कोरोना लॉक डाऊन मुळे त्यांच्यासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे तरी विक्रीची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी केली आहे.
कुंभार समाज हा मातीकाम करून पोट भरणारा समाज असले मुळे त्यांच्यासमोर कुटुंबाची पालनपोषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे, सामान्य नागरिक ह्या उन्हाळ्यातच माठ विकत घेतो व त्याला वारंवार दुकानावर जावे लागत नाही व त्यामुळे कुंभाराच्या दुकानावर गर्दी सुद्धा होणेच नाही,प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून अंतर ठेवून मातीचे भांडे हे गल्लोगल्ली हात गाडी,बैलगाडी वर फिरून किंवा सुरक्षित बाजार मध्ये विक्री करीता येईल. दिनांक 26 एप्रिल रोजी येणार अक्षयतृतीया हा सन महाराष्ट्रासाठी व खान्देश वासीयांसाठी आस्थेचा विषय आहे हा सन घराघरात साजरा होतो त्यासाठी आवश्यकता असलेल्या मातीच्या घागरीला मोठी मागणी असते,तसेच वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक मठातील थंड पाणी पिल्याने आरोग्य चांगले राहते व तृष्णा भागविली जाते परंतु माठ न मिळाल्यास नागरिक फ्रिज अथवा कृत्रिम गारवा देणारे पाणी पितील त्यामुळे घसा खराब होणे ,दुखणे,खोकला,ताप,सर्दी,यासारखे विकार होऊ शकतात व आपल्याला कोरोना झाला कि काय ह्या शंकेने नागरिक घाबरून शासकीय आरोग्य यंत्रणेवर अधिकचे काम वाढेल व कोरोना चाचणी करण्याचा दबाव सुद्धा येऊ शकतो.या सर्व बाबींचा विचार करून कुंभार समाजाला नियमात शिथिलता देवून विक्री हि अत्यावश्यक सेवेत समावेश करून कुंभार समाजाला लॉक डाऊन काळात माठ, रांजण,घागरी विक्रीची परवानगी द्यावी असे आदेश जळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदार,नगरपरिषद ह्यांना जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करावे अशी मागणी कुंभार समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी केली आहे.














