अहमदनगर – ‘महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू माफियांचंच वर्चस्व असून त्यांनीच हे वाळू माफिया निर्माण केले आहेत. आपल्या बगलबच्च्यांना पाठीशी घालण्याच्या धोरणामुळंच हे सगळं झालं आहे,’ असा थेट आरोप भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज केला.
नगर जिल्ह्यातील मुळा-प्रवरेच्या परिसरात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महसूल अधिकारी त्याकडं दुर्लक्ष करत असल्याचा विखे-पाटील यांचा आरोप आहे. त्यामुळंच वाळू तस्करी रोखण्यासाठी विखे-पाटील यांनी स्वत:ची समांतर यंत्रणा निर्माण केली आहे. त्याद्वारे तस्करीची माहिती घेऊन महसूल अधिकाऱ्यांना दिली जाते व त्यांना कारवाई करण्यास भाग पाडले जाते.
याच अनुषंगानं आज पत्रकरांशी बोलताना विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘संपूर्ण राज्यातच वाळू माफियांकडून महसूल अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. मात्र, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. महसूलमंत्री गप्प आहेत. ते स्वत: आपल्या बगलबच्चांना पाठीशी घालतात. खुद्द त्यांच्याच तालुक्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. या सगळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.















