औरंगाबाद – आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळं औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण झालंच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पाटील औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पाटील यांनी आज दिवसभर बैठकांचा धडाका लावला आहे. संघाच्या प्रतिनिधींसोबत सकाळी त्यांची बैठक झाली. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना औरंगाबादचं नाव बदललंच पाहिजे, असं ते म्हणाले. ‘नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत,’ असं ते म्हणाले.
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर व्हावं ही शिवसेनेची जुनी मागणी आहे. इतकंच नव्हे, शिवसैनिकांकडून औरंगाबादचा उल्लेख कटाक्षानं संभाजीनगर असाच केला जातो. मात्र, सध्या शिवसेना काँग्रेससोबत राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्यास शिवसेनेला मर्यादा आहेत. हेच ध्यानात घेऊन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळं येत्या महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा, त्यातही औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा भाजपनं लावून धरला आहे.















