मुंबई – मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळं मराठी भाषा मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठी भाषेचं वाकडं करण्याची कोणाची टाप आहे,’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला.
कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज जगभर मराठी भाषा दिन साजरा होत आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं आज विधान भवनात सरकारच्या वतीनं मराठी भाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. ग्रंथ दिंडीनं या सोहळ्याची सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय आमदार या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नवं स्वीकारताना जुन्याला विसरू नका. मराठी सोबत घेऊन पुढं चला, असं आवाहन उपस्थितांना केलं. ‘मराठीचा दिवस केविलवाणेपणे साजरा करण्याची गरज नाही. काय होणार मराठीचं ही चिंता करण्याची गरज नाही. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. डोके ठिकाणावर आहे का? असं इंग्रजांना ठणकावून विचारणारी मराठीच होती. असं असताना चिंताग्रस्त भावनेनं हा दिवस साजरा का करायचा,’ अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली.















