मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्यास राजगड असं नाव द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे राजगड हा किल्ला वेल्हा तालुक्यात आहे.येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच वेल्हा तालुक्यात हा किल्ला असल्याने किल्ल्याचे नाव वेल्हा तालुक्याला देण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असं या पत्रात सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत ‘राजगड तालुका’ असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. येथील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे ही विनंती, अशी मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मागच्या सरकारच्या काळातही पत्राद्वारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली होती, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करूनही त्याबाबतची माहिती दिली आहे.














