मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर असतानाच राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. ‘देशातील जनतेला भाजपकडून विकास मॉडेल अपेक्षित होते, गुजरातचे दंगल मॉडेल नाही’, असा टोला लगावत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप व केंद्र सरकारवर तोफ डागली.
दिल्लीच्या जाफराबाद परिसरात काल (२४ फेब्रुवारी) भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण आहे. कालच्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींवर जयंत पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
भाजपकडून देशातील जनतेला विकासाचं मॉडेल अपेक्षित आहे. गुजरातचं दंगल मॉडेल नाही, असे नमूद करताना दिल्लीत गुजरातमधील २००२ची पुनरावृत्ती होवू नये याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.














