मुंबई – दिल्लीत जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी देशभरात वातावरण तापलेलं आहे. या घटनेवरुन मुंबईतही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात एका महिला आंदोलकाच्या हातातील ‘फ्री काश्मीर’च्या फलकावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. त्याला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं. पुढे फडणवीसांनीही प्रत्युत्तरादाखल ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
फडणवीस यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचा व्हिडिओ रिट्विट करताना उद्धव ठाकरे यांना ‘फ्री काश्मीर’च्या फलकबाजीचा जाब विचारला. ‘आंदोलन नेमके कशासाठी सुरू आहे? काश्मीर मुक्तीची घोषणा आंदोलनात कशासाठी? मुंबईत असे फुटीरदावादी खपवून का घ्यायचे? मुख्यमंत्री कार्यालयाच्या अवघ्या २ किमी अंतरावर काश्मीर मुक्त भारताची घोषणाबाजी होतेय हे उद्धव ठाकरे खपवून घेणार का?’, असे सवाल फडणवीस यांनी ट्विटमध्ये उपस्थित केले होते.