कोलकाता- नागरिकत्व कायदा, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. जर तुमचा अधिकार कुणी हिसकावू पाहत असेल तर, त्याआधी त्यांना माझ्या मृतदेहावरून जावं लागेल, असा निर्वाणीचा इशारा ममता यांनी दिला. दक्षिण २४ परगणामध्ये आयोजित रॅलीत त्या बोलत होत्या. जर कुणी तुमच्याकडे याच्याशी संबंधित माहिती मागितली तर देऊ नका, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं.
ममता बॅनर्जी यांची २४ परगणामध्ये रॅली झाली. या रॅलीला संबोधित करताना त्यांनी नागरिकत्व कायदाएनपीआर आणि एनआरसीचा मुद्दा उचलून धरला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा लक्ष्य केलं. ‘जर कुणी तुमच्याकडे आले आणि माहिती मागितली तर देऊ नका. मी तुमची पहारेकरी आहे. तर कुणी तुमचे अधिकार हिसकावण्यासाठी येत असतील तर, त्यांना माझ्या मृतदेहावरून जावं लागेल,’ असं त्या म्हणाल्या.