मुंबई – मध्यप्रदेशातील भोपाळ येथे काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारं पुस्तक वाटप केल्याने एकच गदारोळ उठलेला असताना शिवसेनेनेही काँग्रेसला फैलावर घेतलं आहे. सावरकर महान होते आणि आहेत. त्यांची बदनामी करणारी भोपाळची ही घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे.
भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं होतं. त्यावरून भाजप आणि सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेसवर हल्ला चढवतानाच महाराष्ट्रात या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर शिवसेना नेते राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सावरकर आमच्यासाठी महान होते, आहेत आणि राहतील त्याच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होाणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी काँग्रेसला सुनावले आहे.
हे पुस्तक बेकायदेशीर आहे. त्यावर बंदी आहे. तरीही अशी पुस्तके वाटली जातात. भाजप नेत्यांबाबतची पुस्तकेही वाटली गेली आहेत. आम्ही महाराष्ट्रात हे पुस्तक खपवून घेणार नाही. भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही, असं सांगतानाच सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असंही त्यांनी सांगितलं.
भोपाळमध्ये काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत? हे कुणालाही माहीत नाही. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकरांबाबत शिवसेनेची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. तरीही तुम्ही वारंवार का विचारता? असा सवालही त्यांनी केला. सावरकरांबाबत जे लोक बरळत आहेत त्यांच्या डोक्यात घाण साचली आहे. त्यांचं डोकं तपासण्याची गरज आहे. सावरकरांबाबत संपूर्ण देशाला अभिमान आहे, असंही ते म्हणाले.















