जळगाव,(प्रतिनिधी)- तुम्हाला तुमचे स्वप्न आणि ध्येय गाठायचे असेल तर आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. आयुष्य हे एकदाच मिळते, त्याची मजा लुटण्यासाठी आपण आपले शरीर निरोगी ठेवणे हीच जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. दररोजच ४५ मिनिटे आपण आपल्या शरीराला दिलेच पाहिजे. त्यासोबत योग्य आहार, ध्यान-धारणा करा यामुळे तुमचे शारीरिक विकासासोबत तुमचं मानसिक आरोग्य देखील सुधारेल. जीवनामध्ये प्रत्येकाला जबाबदारी आहे, प्रत्येकाला काम करायचेच आहे, परंतु त्याबरोबर आपलं आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी बांबू वर्कआउट क्लबच्या फॅट लॉस स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.
शहरातील अग्रवाल चौकातील जुनी वर्धमान स्कूल येथे बांबू वर्कआउट क्लब फॅट लॉस प्रशिक्षण चालत असते. सदर बांबू वर्कआउट क्लब तर्फे दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ अशी बिग फाटलॉस स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये रोटरी मिडडाऊनचे माजी अध्यक्ष तथा विश्वनाथ ज्वेलर्सचे संचालक मनोज पाटील यांनी पाच महिन्यात तब्बल दहा किलो वजन कमी करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना दिनांक
१८ जुलै २०२५ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या हस्ते फिटनेस गॉगल प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे त्या दिवशी त्यांचा वाढदिवस देखील होता. सदर स्पर्धेमध्ये ज्यांनी तीन किलो, चार किलो, पाच किलो वेट लॉस केले त्यांना देखील पदक देऊन सन्मानित करण्यात आले *सुवर्णपदक* एडवोकेट स्वाती निकम, शशिकांत हिंगोणेकर, स्वस्ती शुक्ला, प्रवीण सपकाळे *रजत पदक* कोमल पाटील, एडवोकेट रेशमा बेहरानी, *कास्यपदक* सारिका गावंडे, जानवी बेहरानी, सौ बडगुजर
कमलाकर पुढे म्हणाल्या की, मी पोलीस खात्यामध्ये काम करते त्यामुळे ताण तणाव हा काही प्रमाणात येतच असतो. परंतु आपण नुसताच ताण-तणावात जगत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो मानसिक आरोग्यावर होतो, आपल्या कुटुंबावर होतो, पर्यायाने आपल्या सामाजिक अस्तित्वावर होत असतो. त्याकरता आपली कितीही व्यस्त दैनंदिनी असली तरी आपण नियमित व्यायाम केलाच पाहिजे. मी नियमित ४५ मिनिटं सायकलिंग, योगा, कार्डिओ यासारखे व्यायाम करत असते त्याचा उपयोग मला माझ्या कामकाजामध्ये होत असतो. वरील सर्व पारितोषिक विजेत्या सदस्यांना बांबू वर्कआउट क्लबचे मुख्य प्रशिक्षक विनोद अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय इंगळे, अयाज मोसिन, संजय मराठे हर्षा सांगोरे, मीनल पाटील यांनी परिश्रम घेतले.