लखनऊ – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी मेरठमध्ये झालेल्या आंदोलनात काही आंदोलकांचा मृत्यूही झाला होता. या मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मेरठला जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या सीमेवरच रोखले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं कारण देत या दोघांनाही मेरठमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आंदोलन सुरू आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. मेरठमध्ये भडकलेल्या हिंसेत चार आंदोलकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. त्यामुळे मेरठमध्ये तणावाचे वातावरण असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये म्हणून मेरठ , मुजफ्फरनगर, बुलंदशहर आणि सहारनपूर येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मेरठला रवाना झाले होते. मात्र उत्तर प्रदेशच्या सीमेवरच पोलिसांनी त्यांना अडवून मेरठला जाण्यास मज्जाव केला. कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं कारण देऊन पोलिसांनी त्यांना मेरठला जाण्यास मनाई केली. राहुल आणि प्रियांका यांनी केवळ तीन जणांनाच मेरठमध्ये जाऊ देण्याची परवानगीही पोलिसांना मागितली. मात्र पोलिसांनी त्यांची ही विनंती फेटाळून लावत त्यांना मेरठमध्ये जाऊ देण्यास असमर्थता दर्शवली.














