जळगाव – गोपीनाथ मुंडे हे आज असते तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसता’, अशी खंत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी एकनाथ खडसे आज सायंकाळी भगवान गडावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी मुक्ताईनगरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. खडसेंनी यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट करून दिली. ते पुढे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण तर झालीच, शिवाय भाजपमध्येही त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. गोपीनाथ मुंडे असते तर… अशा चर्चा देखील आता होत आहेत. ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आधार वाटत होते. आज ते असते तर कदाचित भाजप आणि सेनेतील युती कायम राहिली असती. भाजपची आज जी अवस्था आहे, त्यापेक्षा निश्चित चांगली अवस्था राहिली असती, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांची भूमिका सदैव समन्वयाची असायची, असेही खडसे यावेळी म्हणाले.