मुंबई –भारतीय स्टेट बँकेने (SBI) व्याजदरात (MCLR) ०. १० टक्क्याची कपातकरून कर्जदारांना दिलासा दिला आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी ‘एसबीआय’ पहिली बँक ठरली आहे. या व्याजदर कपातीनंतर एक वर्षासाठीचा (MCLR) आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे.
एसबीआय’ने सर्वच मुदतीच्या कर्जाचा दर (MCLR) ०.१० टक्क्याने कमी केला आहे. एक वर्षासाठीचा MCLR आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे. चालू वर्षात बँकेने सलग आठव्यांदा MCLRमध्ये कपात केल्याचा दावा एसबीआयने केला आहे. नवे व्याजदर येत्या १० डिसेंबरपासून लागू होतील, असे बँकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मात्र रेपो दरांशी संलग्न कर्जे आणि ठेवीदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे ‘एसबीआय’ने स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बँकांनी ग्राहकांना द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मागचे पतधोरणा वगळता त्यापूर्वीच्या सलग पाच पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केला होता. मात्र बँकांकडून पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.














