ठाणे – परस्परविरोधी विचारांची शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आल्याच्या धक्क्यातून जनता सावरत असतानाच भिवंडी महापालिकेत आणखी एक राजकीय चमत्कार घडला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव करून अवघ्या ४ नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीनं भिवंडीचं महापौरपद पटकावलं आहे. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्यानं ही उलथापालथ झाली आहे. ‘कोणार्क’च्या प्रतिभा पाटील निवडून आल्या आहेत.
भिवंडी महापालिकेत याआधी काँग्रेसचे जावेद दळवी महापौर आणि शिवसेनेचे मनोज काटेकर उपमहापौर होते. मात्र, महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेवर आली असताना भिवंडी महापालिकेत शिवसेना, काँग्रेस एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. तर, काँग्रेसच्या वैशाली म्हात्रे यांनी बंडखोरी करून अर्ज भरला होता. मात्र, मतदानाआधी शिवसेनेच्या वंदना काटेकर व काँग्रेसच्या वैशाली म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळं काँग्रेसचा उमेदवार सहज निवडून येईल, असा अंदाज होता. ९० सदस्यांच्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसकडे तब्बल ४७ नगरसेवक आहेत. मात्र, तब्बल १८ नगरसेवक फुटल्यानं निकाल फिरला. कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना ४९ तर, काँग्रेसच्या रिषिका रांका यांना ४१ मते मिळाली.















